पुणे (वृत्तसंस्था) टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना सरकारने पाठवलेल्या भरमसाठ वीजबिलामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.राजकीय पटलावर देखील सध्या वाढीव वीजबिलांचा मुद्दा चांगलाच गाजतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाढीव वीजबिल माफीसाठी आक्रमक झाली असून राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटमचा कालावधी देखील पूर्ण झाला आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसहित अनेक ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत असून राज्य सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई केली असून अटक केली आहे. तर काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पक्षप्रमुख राज ठाकरेंनी सक्त आदेश दिल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
मुंबईत वांद्रे येथे बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला आहे. आंबेडकर गार्डनपर्यंत मोर्चा काढल्यानंतर मनसे नेत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. दरम्यान यावेळी बोलताना बाळा नांदगावकर यांनी सांगितलं की, “कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करायचं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे. कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा राज ठाकरेंचा सक्त आदेश आहे. कुठेही गोंधळ गडबड करायची नाही, तोडफोड करायची नाही”.