नशिराबाद (सुनिल महाजन) बसस्टॅन्ड जवळील संत सावता महाराज प्रवेशद्वारापासून उत्तरेस, बरकत अली यांच्या कार्यालयाजवळ तसेच तरसोद फाट्याजवळील गटार ही कचऱ्याने तुडुंब भरली आहे. सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. नागरीकांना गटारीच्या या घाण पाण्यातून वापरावे लागत आहे. हे सांडपाणी कधी अंगावर उडते, तर कधी हातातल्या वस्तूंवर उडते. रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
लोक अक्षरशः वैतागले आहेत. डेंग्यू, मलेरिया अशा आजारांना यातून निमंत्रण मिळून अनारोग्य निर्माण होऊ शकते. प्रशासन मात्र बेफिकीर आहे. जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे व याकडे मागील ४-५ महिन्यांपासुन प्रशासन हेतुपुस्सर दुर्लक्ष करीत असल्याने, त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गटारीच्या प्रवाहात कोरडा भोपळा सोडून निषेध करण्यात आला.
नशिराबाद येथील नगरपंचायत प्रशासन रिकाम्या भोपळ्यासारखे कर्तव्यशून्य आहे, हे दर्शविण्याचा मनसेने या माध्यमातून प्रयत्न केला आहे. भोपळ्याला “रिकामा” अशी उपमा ग्रामीण भागात दिली जाते. भोपळा आंदोलनामागे “निष्क्रिय व सुस्त” प्रशासन असल्याचे आम्हाला दाखवून द्यायचे आहे, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
भोपळा आंदोलनाची चर्चा दिवसभर गावात रंगली आहे. प्रशासन यापासून बोध घेऊन गटारीचे काम करेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे, शहर अध्यक्ष जितेंद्र बच्चाटे, शहर सचिव गोकुळ धनगर, सचिन भालेराव, लक्ष्मण तायडे, तेजस कोळी, संजय कोळी, गजेंद्र माळी, दुर्गेश वाघुळदे, तसेच मनसे कार्यकर्ते गणेश कोळी, शुभम सोनार, प्रशांत कोलते, चेतन चौधरी, मनोज पाटील सुभाष सुतार, दिलीप सुतार, सुनील रंधे, सुनील पवार, संजय जंजाळ आदि उपस्थित होते.