नवी दिल्ली (वृत्तसंस्था) वाराणासीतील डॉक्टरांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काल भावूक झाले होते. त्यावरून मोदींवर टीका होऊ लागली आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनीही पंतप्रधानांवर टीका केली आहे. निवडणुका संपल्यावर मोदी चॅनेलवर येऊन रडतील हे मी आधीच सांगितलं होतं, असं संजय सिंह यांनी म्हटलं आहे. आपल्या या भविष्यवाणीची आठवण सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून करून दिली.
आम आदमी पक्षानं एक अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल व्यक्त केलेली शक्यता खरी ठरल्याचं म्हटलं आहे. संजय यांनी १७ एप्रिलच्या एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलेलं भाकित २१ मे रोजी खरं ठरलं, असं आपनं पत्रकात नमूद केलं आहे. १७ एप्रिल रोजी संजय यांनी एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी ‘अजून थोडे दिवस वाट पाहा. ते (पंतप्रधान मोदी) तुमच्यासमोर येतील. ते फक्त त्यांच्या लाईट्स आणि कॅमेरासाठी वाट पाहत आहेत. ते टीव्हीवर रडतील आणि देशभरातील वृत्तवाहिन्या पंतप्रधान कशापद्धतीने भावुक झाले आणि रडू लागले याबद्दलच्या बातम्या दाखवतील,’ असं म्हटलं होतं.
याच मुलाखतीचा काही भाग शेअर करत संजय सिंह यांनी मोदींवर शुक्रवारी ट्विटरवरुन निशाणा साधला. ‘जे १७ एप्रिलला बोललो होतो, ते २१ मे रोजी खरं ठरलं. देशाला एक संवेदनशील आणि चांगल्या मनाची व्यक्ती हवीय. ढोंग करणारे पंतप्रधान देशाला नको, ज्यांनी स्वत: निवडणुकीदरम्यान प्रचारसभा घेऊन कोरोनाचा प्रसार केला आणि आता रडण्याचं नाटक करत आहेत,’ अशा शब्दांत संजय सिंह यांनी शरसंधान साधलं आहे.
अन् मोदी भावूक झाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणासीतील डॉक्टरांशी संवाद साधला होता. आपली लढाई एका अदृश्य आणि धूर्त शत्रूविरोधात आहे. सतत बदलणाऱ्या या शत्रूमुळे आपल्याला सावध राहिलं पाहिजे. लहान मुलांना वाचवणं आवश्यक आहे. त्यासाठी पावलं उचलली पाहिजेत, असं सांगताना मोदी भावूक झाले होते. यावेळी त्यांनी ब्लॅक फंगसपासून सावध राहण्याच्या सूचनाही दिल्या. या आजारापासून सावध राहून अॅक्शन घ्यायची आहे. संकटाच्या काळात काहीवेळा लोकांची नाराजीही ओढवते. मात्र, तरीही आपल्याला काम करत राहायचं आहे. त्यांचं दु:ख कमी करायचं आहे, असा सल्लाही त्यांनी दिला होता.