लंडन (वृत्तसंस्था) मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचे लंडनमध्येही पडसाद उमटले आहेत. येथील सेंट्रल लंडनच्या परिसरातील भारतीय दूतावासाबाहेर रविवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलिसांनी १३ आंदोलकांना ताब्यात घेतले.
या आंदोलकांनी फलक झळकावत आणि घोषणाबाजी करत मोदी सरकारच्या कृषी कायद्यांचा निषेध केला. या आंदोलनामुळे सेंट्रल लंडनच्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यानंतर पोलिसांनी कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. कृषी कायदा २०२० विरोधात भारतात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ब्रिटनमध्ये रविवारी भारतीय दुतावासाबाहेर मोठे आंदोलन करण्यात करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात आली तसेच खलिस्तानवादी झेंडेही फडकले. याबाबत ब्रिटनच्या लंडनस्थित भारतीय उच्चायोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. भारतीय उच्चायोगाने सांगितलं की, “हा गंभीर प्रकार आहे. कारण कोरोना महामारीदरम्यान भारतीय उच्चायोगासमोर ३५०० ते ४००० लोक सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन करत एकत्र आले. सुमारे ७०० वाहनं या रॅलीमध्ये सहभागी झाली होती. उच्चायोगाला याची माहिती होती की, लंडन पोलिसांनी ३० पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्याची परवानगी दिली नव्हती तसेच या आंदोलनासाठी ४० वाहनांची परवानगी घेण्यात आली होती.
गेल्या 11 दिवसांपासून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधून आलेले शेतकरी दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन बसले आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत, ही या आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि आंदोलकांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. आता ९ डिसेंबरला पुन्हा एकदा चर्चा केली जाणार आहे.