मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र हातात आल्यानंतर आमदार भाई जगताप यांनी पहिल्याच दिवशी स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने २२७ जागा स्वबळावर लढवाव्यात असं कॅप्टन म्हणून माझं मत असल्याचं भाई जगताप म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही महाविकास आघाडीनं भाजपला जोरदार धक्का दिलाय. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, असा दावा केला जातोय. अशावेळी मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केलीय. काँग्रेस हायकमांडकडून शनिवारी भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आज भाईंनी मोठं वक्तव्य केलंय. मुंबईत काँग्रेस विरोधी पक्षात आहे. त्यामुळे इतर सगळ्यांना विरोध राहील, अशी घोषणाच जगताप यांनी केली आहे. मुंबईत कॅप्टन म्हणून बदल निश्चित करुन दाखवणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. माझ्या साथीला अनुभवी आणि चांगली टीम दिली आहे. नाराज नेत्यांना सोबत घेऊन काम करणार. सगळ्यांना बरोबर घेऊन काम करेन. कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम करेन, असंही भाई जगताप म्हणाले. मुंबई महापालिकेत एक वेळ होती ज्यावेळी काँग्रेसचे ७५ नगरसेवक होते. मात्र मागील १० वर्षांमध्ये ही संख्या ३० ते ३५ वर आली आहे. ही संख्या वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीने लढणार असल्याचंही भाई जगताप यांनी स्पष्ट केलं. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर भाई जगताप यांनी चंपाषष्ठीनिमीत्त जेजुरी येथील खंडेरायाचं दर्शन घेतलं.
भाजपाने मेट्रो कारशेडचा मुद्दा राजकीय बनवला असल्याचा घणाघातही जगताप यांनी केला. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर महापालिका निवडणुकांमध्ये तिन्ही पक्ष काय रणनिती आखतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यातच काँग्रसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा देत नवीन चर्चेला वाट करुन दिली आहे.















