मुंबई (वृत्तसंस्था) समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिस आपल्यावर पाळत ठेवत असल्याची तक्रार राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे केली होती. त्यातच आता या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. त्यानुसार ओशिवरा पोलिस ठाण्यातील पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार एनसीबीकडून करण्यात आली होती. याप्रकरणी वानखेडे यांच्यासह एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची भेट घेतली व दोन पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार केली होती.
काही लोक माझ्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत, असे वानखेडे यांनी जैन आणि पांडे यांना सांगितले होते. यानंतर दोन जण वानखेडे यांच्यावर पाळत ठेवत त्यांच्या मागावर असल्याचे कथित सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. हे प्रकरण फार गंभीर आहे असे सांगत वानखेडे यांनी यावर थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता.
त्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यातील गुप्तहेरांकडून त्यांची हेरगिरी केली जात असल्याच्या तक्रारीत तथ्य नाही असे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. तसेच दोन पोलीस ओशिवरा स्मशानभूमीत वाहन चोरीच्या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यासाठी गेले होते अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.