नवी मुंबई (वृत्तसंस्था) तळोजामधील नावडे येथे एका पतीने आज (दि.१२) पत्नीवर हल्ला करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादामुळे ही घटना घडल्याचे समजते. पतीनं पत्नीला चाकू भोसकून हत्या केल्यानंतर स्वत: रेल्वेखाली येवून आत्महत्या केली. या प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई पोलिस करत आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही धक्कादायक घटना घडल्यानं नावडेसह नवी मुंबई परिसर हादरला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेली माहिती अशी की, गणेश दुर्गंडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर त्याची पत्नी अर्चना दुर्गंडे गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीनं कळंबोली येथील रुग्णालयात हलवण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहे. अर्चनाची प्रकृती चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. दरम्यान, यापूर्वी अशीच गेल्या काही दिवसांपूर्वी विरारमध्ये घडली होती. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर प्राणघातक हल्ला करून पतीनं आत्महत्या केली होती. करसन पुरजा वसरा असं मृत पतीचं नाव होतं तर मंजू करसन वसरा असं जखमी पत्नीचं नाव आहे. विरार पूर्व भागात साईबाबा मंदिराजवळ ही घटना घडली होती. मंजूचा पती करसन हा तिच्या चारित्र्यावर कायम संशय घेत होता. याच संशयातून त्यानं धारदार चाकूनं मंजूच्या तोंडावर, हातावर सपासप वार करून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. नंतर करसन यानं बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती.