सांगली (वृत्तसंस्था) सांगली जिल्ह्यातील भोसे येथे मद्यपान करताना मित्रांना शिवीगाळ केल्याने भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की, एका तरुणाचा त्याच्या दोन मित्रांनीच खून केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोघांनी मित्राची हत्या केल्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करुन कूपनलिकेच्या पाईपमध्ये टाकल्याची कबुली दिली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, २४ वर्षांचा दत्तात्रय शामराव झांबरे हा तरुण २८ जुलैपासून बेपत्ता होता. जवळपास दोन आठवड्यांनी त्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ उकलले आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील भोसे गावामध्ये हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला. दत्तात्रय झांबरे २८ जुलैपासून बेपत्ता होता. दत्तात्रय हा अमोल आणि सागर या दोघांसोबत मद्यपान करत असताना शिवीगाळ करण्यावरुन तिघांमध्ये खटके उडाले. या रागातून अमोल आणि सागर या दोघांनी त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. इतक्यावर न थांबता आरोपींनी दत्तात्रयच्या शरीराचे तुकडे केले आणि कूपनलिकेत टाकले. दत्तात्रयच्या खून प्रकरणी अमोल ऊर्फ धर्मराज आनंदा खामकर (वय २७ वर्ष) आणि सागर सुरेश सावंत (वय २५ वर्ष) या दोघांनी कबुली दिली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.