जळगाव (प्रतिनिधी) सत्ताधाऱ्यांसह गटनेते व काही ठरावीच सदस्यांना सोबत घेवून जळगाव जिल्हा परिषदेत १८ कोटींचे परस्पर नियोजन करण्यात आले आहे. शिवाय त्यास मान्यता घेण्याचा घाट देखील सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या (NCP) सदस्या डॉ. निलम पाटील यांनी केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे तक्रार केल्याचे देखील त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी सदस्यांकडून मागील पाच वर्षापासून निधी वाटपात अन्याय केला जात आहे. गटनेते सत्ताधाऱ्यांशी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून स्वत:च्या गटात कामे मंजुर करून घेतात. अन्य सदस्यांना मात्र वाऱ्यावर सोडतात. याबाबत देखील उपमुख्यमंत्रीकडे तक्रार केली. विषेश म्हणजे भाजपाच्या सदस्यांना देखील निधी देतांना मापात पाप केले जात असुन राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या अनेक सदस्यांना निधीत मोठ्या प्रमाणात कुचराई केली जात आहे. काही सदस्यांच्या पदाधिकाऱ्यात कोटीची कामे दिली आहे. तर अन्य सदस्यांच्या गटात देखील ४० लाखाचा फरक निधी वितरीत करतांना झाला आहे.
३०५० व ५०५४ तसेच सिंचनाच्या हेडवरील १८ कोटीची कामे यात ठराविक सदस्यांचीच कामे दिली. त्यात आमच्यावर अन्याय झाला असल्याचे डॉ. निलम पाटील यांनी सांगितले. याबाबत माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा केली आहे. १८ कोटीचा निधी थांबवा या मागणीसाठी एकनाथराव खडसे यांच्यासह जिल्हाध्यक्ष ॲड. पाटील व स्वतः देखील ५ जानेवारीला मुंबई येथे उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.