अमरावती (वृत्तसंस्था) अमरावतीत राजकारण तापलंय. आज पहाटे अमरावतीमध्ये मोठ्या पोलिस बंदोबस्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला. रवी राणा यांनी विनापरवाना हा पुतळा उभारल्यानं या पुतळ्यावर पोलिसांनी कारवाई करत हा पुतळा हटवला होता. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, खा. नवनीत राणा घराबाहरे पडून कार्यकर्त्यांना भेटल्या. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी विनापरवानगी आमदार रवी राणा यांनी हा पुतळा बसवला होता. हा पुतळा अनधिकृतरित्या बसवण्यात आल्याचं कारण सांगत पोलिसांनी पहाटे हटवला. त्यानंतर शहरातील वातावरण तापलंय. त्यानंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानी पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. त्यामुळे युवा स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या घरासमोर जमले आहेत. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी कुठलीही गडबड करू नये आणि शहरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. आमदार राणा यांच्या घरालगत दोन्ही बाजूने बॅरिकेट्स लावण्यात आले आहे.
दरम्यान, खासदार नवनीत राणा घराबाहरे पडून कार्यकर्त्यांना भेटल्या. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. खासदार राणांच्या घराबाहेर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं.
ठाकरे सरकारची हुकुमशाही
“आमचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून ठाकरे सरकारने त्यांची हुकुमशाही वृत्ती दाखवली आहे. दहशतवादी असल्यासारखं खासदार आणि आमदारांना स्थानबद्ध केलं जातंय. आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. अशा प्रकारे ठाकरे सरकार छत्रपतींचा अपमान करतंय,” असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.