पाटणा (वृत्तसंस्था) संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडी समोर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, महाआघाडी व एनडीए यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचा आकडा कमी होताना दिसत असून, एनडीचा आकडा वाढू लागला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचल आहे.
माहितीनुसार, मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आघाडीवर असलेली महागठबंधन आता पिछाडीवर पडली आहे. तर भाजपप्रणित एनडीएने आता जवळपास ११७ जागांवर आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी १२२ जागांची गरज आहे. तर महाआघाडीला ९५ जागा मिळाल्या आहेत.
दरम्यान, बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. त्यासाठी ३ टप्प्यांत मतदान झाले. आता प्रतीक्षा निकालाची आहे. बिहारच्या ३८ जिल्ह्यांमधील ५५ केंद्रांवर मतमोजणी होईल. मतमोजणी केंद्रांबरोबरच निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये या उद्देशातून राज्यभरात कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.