मनमाड (वृत्तसंस्था) पुणे-इंदूर महामार्गावर रविवारी एका भीषण अपघातामध्ये पाच जण ठार झाले. मनमाड-येवला मार्गावर समोरासमोर कंटेनर आणि चारचाकी कारची धडक झाल्याने कारमधील नाशिकच्या पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
यात मनमाड-येवला मार्गावर अनकवाडे गावाच्या पुढे सायंकाळच्या सुमारास रेल्वे पुलावर कंटेनर आणि स्विफ्ट कार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाचही तरुण जागीच ठार झाले. मयतांमध्ये २२ ते ३० वयोगटातील तरुणांचा समावेश असून, श्रेयस धनवटे, गणेश सोनवणे, ललित सोनवणे, धनवटे, प्रतीक नाईक नाईक, अशी ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.
ललीत शरद सोनवणे व गणेश सोनवणे हे दोघे सख्खे भाऊ असून पेठरोड, पंचवटी, येथील रहिवाशी आहेत तर अन्य तिघे गंगापूररोड भागातील रहिवाशी आहेत. हे सर्वजण नाशिक येथील रहिवासी असून, मनमाड जवळच्या कुंदलगाव म्हसोबा येथे धार्मिक कार्यक्रम आटोपून येवलामार्गे नाशिक जात असतांना हा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारचा पत्रा कापून पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले, मृतदेह येवला उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून दिलासा देत सांत्वन केलं.