मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील जनतेला १०० युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर मी अजूनही ठाम आहे. पण मागच्या सरकारने जे पाप करून ठेवलं आहे. त्याचं आधी निरसन करून नंतरच १०० युनिट वीज माफी देण्याचा निर्णय घेण्यात येईल. असं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आज स्पष्ट केलं.
१०० युनिट वीज माफी करावी असं मला वाटतं, असं मी म्हणालो होतो. त्यासाठी अभ्यासगटाची समिती स्थापन करण्यात आली. पण मधल्या काळात कोरोना आल्याने या अभ्यासगटाच्या बैठका झाल्या नाहीत. त्यामुळे समितीचा अहवाल आला नाही. आताची महावितरणची आर्थिक स्थिती पाहता ५९ हजार कोटींची तफावत आली आहे. मागच्या सरकारनं जे पाप करून ठेवलं आहे. त्याचं निरसन करूनच १०० युनिट वीज माफीचा निर्णय घेण्यात येणार असून १०० युनिट वीज माफी देण्यावर मी ठाम आहे. ही वीज मी माफ केल्याचं तुम्हीही पाहाल, असं राऊत म्हणाले. कारण मी केंद्राला वारंवार पत्र लिहून ऊर्जा विभागाकडे १० हजार कोटींच्या अनुदानाची मागणी केली. मात्र, केंद्राने त्यावर अद्यापही निर्णय घेतला नाही, त्यामुळे भाजपने केंद्राविरोधात आंदोलन करावं, असा टोला राऊत यांनी लगावला. तसेच केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे २० हजार कोटी रुपये दिले तर वाढीव वीज बिलाला माफी देऊ, असंही ते म्हणाले. महावितरणची मार्च २०१४ची अखेरची थकबाकी १४ हजार १५४ कोटी होती. ही थकबाकी आता ५९ हजार १४ कोटी इतकी आहे. त्यामुळे या विषयावर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली.