जळगाव (प्रतिनिधी) भोंगे प्रकरणावरून कोणाचे पोट भरले नाही. मात्र लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व केले जात असल्याची टीका ही माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे.
सकाळची अजान बंद झाली तशी सकाळी मंदिरात होणारी आरतीही बंद करावी लागली असल्याने वारकरी संप्रदायात नाराजी पसरली असल्याचंही खडसे म्हणाले. अमळनेर येथे झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्ता संवाद यात्रेनिमित्त आयोजित सभेत एकनाथ खडसे यांनी भाजप आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मशिदीवरून भोंगे खाली उतरवण्यासाठी राज ठाकरे यांनी जे आंदोलन सुरू केले. त्यात मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी गेले आणि मंदिरावर असलेले भोंगे ही उतरावण्याची वेळ आली आहे.
यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी म्हटले, की महागाईमुळे जनता त्रस्त असताना या विषयावरून लक्ष इतरत्र हलविण्यासाठी विरोधी पक्ष नेते विविध नवे विषय उकरून काढत आहेत. त्यात माध्यमांचा विचार केला; तर गेल्या महिन्या भरापासून कधी ॲड. सदावर्ते परिवार, कधी राना दाम्पत्य सुरू होते. त्यात आता राज ठाकरे यांच्या भोंगा विषयावर दिवस रात्र बातम्या सुरू आहेत. मात्र एकही विरोधी पक्षातील नेता अथवा टिव्ही चॅनल हे महागाई विरोधात बोलताना दिसत नाही. जसे राज्यात दुसरे विषय नाही.