मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या संकटकाळातही केंद्र सरकार प्रशासनाला हाताशी धरून भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये राजकारण करत आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. राज्यातील विरोधी पक्षाने याचा सर्वप्रथम विरोध केला पाहिजे. परंतु, त्यांना केंद्र सरकारची ही कृती महाराष्ट्राचा अपमान वाटत नसेल तर विरोधकांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार उरणार नाही, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला सुनावले आहे.
ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली. भाजपचे मुख्यमंत्री असलेल्या राज्यांमध्ये कोरोना पळालेला आहे. तर सरकार नसलेल्या राज्यांमध्ये कोरोना आहे, अशाप्रकारे केंद्र सरकार वागत आहे. जर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब ही तीन राज्यं कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरले असं केंद्रीय सचिवांचं म्हणणं असेल तर सर्वात आधी हे केंद्र सरकारचं अपयश आहे. ही संपूर्ण लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली लढली जात आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.
भाजप नेत्यांना राऊतांच्या कानपिचक्या
लॉकडाउन केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याच्या इशाऱ्यावर बोलताना ते म्हणाले की, “त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम असेल तर करु द्यावं. पण आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवाची काळजी आहे. एकीकडे महाराष्ट्र सरकार अपयशी झाल्याचं म्हणायचं आणि दुसरीकडे तुम्ही मुख्यमंत्र्यांना त्यासंदर्भातील निर्णय घेऊ देत नाही. हे काय चाललं आहे?”.
“कोरोना संदर्भातील प्रत्येक सूचनेचं पालन राज्य सरकारं करत आहेत. जी तीन राज्यं अपयशी ठरलं असं सचिव म्हणत आहेत तिथे बिगरभाजपा सरकार आहे. म्हणजे जिथे भाजपाचं सरकार नाही तीच राज्यं अपयशी ठरली आणि जिथे सरकार आहे तिथे कोरोना पळून गेला…कारण तिथे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत असं तंत्र या लोकांनी निर्माण केलं आहे का?,” असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.
केंद्र सरकारने अशा प्रसंगी अत्यंत सावध आणि संवेदनशीलपणे वागायला हवं. असे आरोप-प्रत्यारोप करु नयेत. महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी ‘प्राण जाये पर वचन ना जाये’, अशा पद्धतीने करोनासंदर्भातील लढाई सुरु ठेवली आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.