लातूर (मोहर दिवटे) गेल्या मार्च महिन्याची गोष्ट. लातूर परिमंडलात विजेच्या बिलांची वसुली या ना त्या कारणाने बरीचशी रेंगाळली होती. तशी ती राज्यातल्या इतर परिमंडलातही कमी अधिक प्रमाणात रेंगाळलेलीच होती. रेंगाळलेल्या वसुलीला गती देण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल साहेबांनी मुख्यालयातून वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकेक टीम क्षेत्रिय कार्यालयात पाठवून दिली होती. त्यानुसार लातूर परिमंडलाची जबाबदारी तेव्हा वाणिज्यिक संचालक असलेले श्री. सतीश चव्हाण आणि तांत्रिक आस्थापनेचे मुख्य महाव्यवस्थापक श्री. भरत जाडकर यांच्यावर होती. परिणामी दोघांनीही परिमंडलात वीज कर्मचाऱ्यांची ऊर्जा चेतवत 252 कोटी रुपयांच्या विक्रमी वसुलीचे काम लीलया पार पाडले. दुर्दैवाने स्थानिक अधिकारी-कर्मचाऱ्यांसह अथक काम करता करता ते दोघेही कोरोना पॉझिटिव्ह होऊन गेले होते.
कोरोना महामारीचा तो काळ होता. बहुदा तो दिवस सुट्टीचा होता. कोरोनाची गडद छाया असूनही भरत जाडकर साहेब परिमंडल कार्यालयात बैठकीसाठी आले होते. मीही बैठकीसाठीच आलो होतो. योगायोगाने आम्हा दोघांची कार्यालयाच्या पायऱ्या चढताना समोरासमोर भेट झाली. जाडकर साहेब दिव्यांग… स्वाभाविकच मी त्यांना आधारासाठी हात पुढे केला. तितक्यात साहेब हसले आणि म्हणाले. “अहो, तुम्ही मला काय आधार देताय? मी दिव्यांग दिसतोय? छे… मी दिव्यांग कसला, मी तर समर्थ आणि सक्षम आहे.” जाडकर साहेबांचं ते कथन त्यांचं नव्हतं, तर ते त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीतून आलं होतं. ते शरीराने दिव्यांग असले तरी मनाने खंबीर आहेत. ते माझ्या लक्षात आलं आणि खरंच जाडकर साहेब स्वत: कोरोनाग्रस्त होईपर्यंत सतत पंधरा ते वीस दिवस इथल्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडले. लातूरच्या त्या मोहिमेत त्यांनी अगदी शाखा कार्यालयापर्यंतचा मॅरेथॉन दौरा केला. वीज कर्मचाऱ्यांत एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. शारीरिक दुर्बलतेवर मात करून त्यांनी प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर मुख्यालयाने सोपविलेली जबाबदारी लीलया पार पाडली.
जन्माने किंवा अपघाताने आलेले दिव्यांगत्व हे शापच! परंतु, त्याला कुरवाळत बसून नशिबाला दोष देत आयुष्याचे रडगाणे गाणारे कमी नाहीत. मात्र, त्यावर आपल्या कर्तृत्वाने मात करून मिळालेल्या आयुष्याचं सोनं करता येतं. ते जाडकर साहेबांसारख्या अवलियाकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. श्री. जाडकर हे सध्या महावितरण या देशातल्या सर्वात मोठ्या विद्युत वितरण कंपनीतील मुख्य अभियंता तथा मुख्य महाव्यवस्थापक (तांत्रिक आस्थापना) पदावर कार्यरत आहेत. त्यांचे काम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरावे असेच आहे.
भरत बिरू जाडकर हे मूळचे लातूर जिल्ह्यातील सिंधगाव (ता. रेणापूर) येथील रहिवाशी. हालाखीची परिस्थिती असणाऱ्या शेतकरी कुटुंबात झालेला जन्म. अगदी बालपणातच त्यांना पोलिओ पॅरॅलिसीसचा अटॅक आला आणि त्यांच्यावर कायम दिव्यांगत्वाचे अरिष्ट कोसळले. त्यावर मात करीत त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण अंबाजोगाई येथे पूर्ण करून बारावीनंतर औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून 1989 साली विद्युत अभियांत्रिकीची पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. मुख्य अभियंता भरत जाडकर हे विधी शाखेचेही पदवीधर आहेत, हे उल्लेखनीय!
अभियांत्रिकी पदवीनंतर 1990-91 मध्ये त्यांनी अंबाजोगाई येथील टी. बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालय आणि लातूर येथील एम.एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले. 1991 मध्ये जाडकर यांची तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झाली. आपल्या दिव्यांगत्वाचा बाऊ न करता जाडकर यांनी 1991 ते 2014 या कनिष्ठ अभियंता ते अधीक्षक अभियंता या वेगवेगळ्या पदावर रत्नागिरी, बीड, उस्मानाबाद, लातूर, मुंबई, नाशिक आणि महावितरण मुख्यालय मुंबई येथे सक्षमपणे काम केले. सातत्यपूर्ण आणि चांगल्या कामगिरीच्या जोरावरच त्यांना 2014 साली महावितरणच्या मुख्य अभियंता पदावर काम करण्याची संधी मिळाली.
अलिकडच्या काळात महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामीण भागातली विद्युत व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी ग्रामविद्युत व्यवस्थापकाची रचना करण्यात आली. त्यासाठी महावितरणला त्या-त्या गावातून नेमण्यात आलेल्या विद्युत व्यवस्थापकांमध्ये वीजविषयक तांत्रिक कौशल्य निर्माण करायची होती. त्यासाठी पुरेशा प्रभावी अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची आवश्यकता होती. त्याची सर्वस्वी जबाबदारी भरत जाडकरांनी प्रभावीपणे पार पाडली होती. त्यासंबंधीचे महाराष्ट्र शासनाचे शासन आदेश काढण्यासह एकूणच त्या कार्यक्रमाची संपूर्ण प्रक्रिया त्यांनी उत्तमरितीने राबविली. त्याशिवाय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा फेरनियुक्तीचा विषयही त्यांनी प्रभावीपणे राबविला. भविष्यात लाचलुचपतीचे प्रकार विद्युत कर्मचाऱ्यांकडून घडू नयेत. त्यासाठीचा त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रमही दखलपात्र ठरला.
नाशिक येथील प्रशिक्षण व सुरक्षा केंद्रातही मुख्य अभियंता म्हणून त्यांनी कामगिरी केली आहे. सध्या ते व्यवस्थापनाच्या सहकार्याने महावितरण मुख्यालयात मुख्य महाव्यवस्थापक (तांत्रिक आस्थापना) म्हणून कर्तव्य बजावत आहेत. दिव्यांगत्वाची कुठलीही जाणीव होऊ न देता आणि त्यासंदर्भात कुठेही कुणाकडून सहानुभूती न मिळवता केलेली त्यांची कामगिरी इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.
भरत जाडकर यांनी केवळ कार्यालयीन आभियांत्रिकीचेच काम केलेले नाही, तर प्रत्यक्ष क्षेत्रिय कार्यातही त्यांचा मोठा लौकीक राहिलेला आहे. सोलापूर येथे कार्यकारी अभियंता असताना चाचणी शाखेत त्यांनी अतुलनीय कामगिरी केलेली आहे. सोलापूर चाचणी शाखेत पॉवर ट्रान्सफॉर्मर जळून नादुरुस्त होऊ नयेत म्हणून त्यानी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या तेथील चार वर्षाच्या काळात सोलापुरात एकही पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला नाही.
अधीक्षक अभियंता पदी निवड झाल्यानंतर 2010-11 च्या काळात देशातील प्रथम पॉवर डिस्ट्रीब्यूशन फ्रँचायजी नेमलेल्या भिवंडी येथे नोडल ऑफिसर म्हणून कामगिरी करीत महावितरण व महावितरण व्यवस्थापनास महत्त्वपूर्ण अशी सहायक भूमिका त्यांनी पार पाडली. भरत जाडकर हे अत्यंत संयमी, मितभाषी स्वभावासाठी परिचित असून ते समन्वयवादी व्यक्तिमत्त्व् आहे. ते अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त त्यांना त्यांच्या यशस्वी वाटचालीस महावितरण परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.