मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी हिंदूमध्ये फूट पाडण्याचे काम केले आहे. त्यामुळे राज्यापालांना घरी पाठवायचे की तुरुंगात पाठवायचे याचा विचार करण्याची गरज आहे. गेल्या तीन वर्षापासून ज्या महाराष्ट्राचे मीठ त्यांनी खाल्ले. त्या मिठासोबत त्यांनी नमकहरामी केली आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर जोरदार टीका केली.
राज्यपालांचं हे विधान अनावधानाने आलेलं नाही. काहीवेळा आपले राज्यपाल फार तत्परतेने काम करताना दिसतात. तर काही ठिकाणी मात्र अजगराप्रमाणे सुस्त बसलेले असतात. यापूर्वीही सावित्रीबाई फुलेंबाबत यांनी हिणकस असं विधान केलं होतं. आता मुंबईबद्दल बोलून त्यांनी मराठी जनतेचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांची स्क्रिष्ट दिल्लीतून येते की मुंबईतून याचा शोध घेतला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.
कोल्हापुरी वहान हे जगप्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ काय लावायचा तो तुम्ही लावा. मी त्यावर बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील कष्टकरी लोकांनी तो तयार केला आहे. कोल्हापुरी जोड्याचा उपयोग कसा करतात. त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. ‘घी देखा लेकीन कोल्हापुरी जोडा नही देखा’ असे जर असेल तर त्यांना कोल्हापुरी जोडे सुद्धा दाखवण्याची वेळ आली आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत राज्यपालांचा समाचार घेतला.
कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य हे फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबई, ठाण्यासह राज्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यांनी भाषिकांमध्ये, हिंदू म्हणून एकवटलेल्या नागरिकांमध्ये फूट पाडण्याचे काम केले आहे. राष्ट्रपतींचे दूत असलेल्या राज्यपालांनी सर्वांना समान वागणूक देणे अपेक्षित आहे. कोश्यारी यांनी आग लावण्याचे काम केले आहे. त्यांना घरी पाठवायचे की तुरुंगात पाठवायचे हे ठरवण्याची वेळ आली आहे.
ठाकरे म्हणाले की, गेल्या तीन वर्षातील त्यांची विधाने असतील, काही त्यांचे कॅमेऱ्याने टिपलेली दृष्य असतील, ते पाहिल्यावर महाराष्ट्राच्या नशिबी असे माणसे का येतात हा प्रश्न पडला आहे. मी मुख्यमंत्री असताना सुद्धा लॉकडाऊनमध्ये त्यांना मंदीरे उघडण्याची घाई झाली होती. तेव्हा त्यांच्या पत्राला मी उत्तर दिले होते. याशिवाय त्यांनी महात्मा फुले यांचाही अपमान केला होता. आज त्यांनी कहर केला आहे. हे विधान अनावधानाने आलेले नाही. मागच्या काही दिवसांपासूनचे सगळे वरती आले आहे. त्यांची भाषण कोण लिहुन देते माहित नाही.