नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून देशवासियांना सावध केलं आहे. कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे. ”तर आता अशी वेळ आलीये की, घरातही मास्क घालावा लागेल. असं केंद्राने म्हटलं आहे.
देशात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. केंद्र सरकारने तर कोरोनाची ही दुसरी लाट अत्यंत भयंकर असून आता घरातही मास्क लावण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं स्पष्ट होत आहे. ऑक्सिजन टँकर्समध्ये जीपीएस लावण्यात आले आहेत. या टँकर्सची सरकार मॉनिटरींग करत आहे. शक्य तितक्या लवकर रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शन हे संजीवनी नाही. रेमडेसिवीरला रामबाण औषध किंवा संजीवनी आहे, असं मानण्याचं कारण नाही. तो तुमचा गैरसमज असेल. त्यामुळे या इंजेक्शनचा साठा करणं योग्य नाही. कोरोनाच्या संसर्गाच्या सुरुवातीला रेमडेसिवीर घेतल्याने काहीही फायदा होत नाही. सौम्य लक्षणे असतील तर इतर सपोर्टिव्ह ट्रीटमेंटनेही रुग्ण बरा होतो. काढा, घरगुती उपा, वाफ घेणे, गुळणी करणे आदी गोष्टी केल्यानेही कोरोनाची सौम्य लक्षणे असलेला रुग्म बरा होतो. त्यामुळे पॅनिक होऊ नका, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
मासिक पाळीतही लस घ्या
महिलांनी मासिक पाळीत लस घेऊ नये, त्यामुळे रिअॅक्शन होण्याची शक्यता असते. अशा आशयाचे मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरही केंद्राने स्पष्टीकरण दिलं आहे. मासिक पाळीतही महिला इंजेक्शन घेऊ शकतात. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे, असं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.