जळगाव (वृत्तसंस्था) आमच्याशी गद्दारी करुन राष्ट्रवादी, काँग्रेसला जाऊन मिळाले. मात्र याचं फळ शिवसेनेला मिळालं आहे. आता नावासाठी, चिन्हासाठी भांडत आहेत, परवा मैदानासाठी भांडत होते, आता काही दिवसांनी शिवसेना भवनसाठी मारामाऱ्या होतील, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. गिरीश महाजन यांनी जळगावात एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी ते बोलत होते.
गिरीश महाजन बोलताना म्हणाले की, अडीच वर्षांचा आमचा काळ फुकट गेला. आमच्या पाठीशी शिवसेनेनंच खंजीर खुपसला. लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाणचा अनुभव हागणदारी वरून मला आला असून या विषयावर आपली मोठी कोंडी झाल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी ग्रामविकास मंत्री आहे. राज्यात मी सगळीकडे हागणदारी मुक्तीबद्दल लोकांना हगणदारीमुक्त गावं करा, रस्त्यावर कुणीही शौचास बसून नका, याबाबत सांगत असतो आणि माझ्याच तालुक्यात केकतनिंभोरा या गावात रस्त्यालगत एक, दोन नव्हे 50 लोक रस्त्यालगत बसलेले दिसले.”, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
मी राज्यात लोकांना कोणत्या तोंडानं सांगायचं म्हणत गिरीश महाजन यांनी आपल्या डोक्याला हात मारून घेतला. यावेळी सभेत उपस्थितांना हसू अनावर झालं. माझ्या तालुक्यातच जर अशी परिस्थती आहे, तर मी इतरांना काय सांगेन, म्हणून माझी हातू जोडून सर्वांना विनंती आहे, उघड्यावर शौचास बसू नका, हे थांबविण्यासाठी यापुढे मी गांधीगिरी करणार असून रस्त्यावर बसणाऱ्या लोकांना गुलाबपुष्प देणार आहे. स्वच्छतेसाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असं आवाहनही यावेळी गिरीश महाजन यांनी केलं आहे.