नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना विषाणूची नवीन प्रजाती आढळून आल्यानंतर ब्रिटन येथून आलेले तब्बल २० जण कोरोना संक्रमित असल्याची माहिती आहे. त्यामुळे भारत सरकारने युकेहून येणाऱ्या लोकांसाठी कठोर गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये विमानतळावर प्रत्येकाची आरटी-पीसीआर चाचणी करणे अनिवार्य असेल. निती आयोगचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल यांनी मंगळवारी सांगितलं, की याबाबत घाबरण्याची गरज नाही.
“भारतात आतापर्यंत याप्रकारचा विषाणू आढळून आलेला नाही आणि त्याच्या स्वरुपातही कुठला महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणुच्या (SARS-CoV-2 Strain) नव्या स्वरुपाने लशीच्या विकासावर कुठलाही परिणाम पडणार नाही”, असं त्यांनी सांगितलं. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकारानं चिंता वाढवली आहे. आधीच्या कोरोनापेक्षा नव्या प्रकारचा विषाणू झपाट्यानं पसरत चालला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. नियोजित विमान काल (२२ डिसेंबर) देशात विविध ठिकाणी दाखल झाली. यातून आलेल्या प्रवाशांपैकी २० प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे या रुग्णांच्या माध्यमातून कोरोनानं भारतात शिरकाव, तर केला नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. भारत आणि ब्रिटनमधील विमानसेवा बुधवारपासून ३१ डिसेंबपर्यंत बंद राहणार आहे. मंगळवारी ब्रिटनमधून भारतात असंख्य प्रवासी दाखल झाले. कोरोनाचा नव्या प्रकार रोखण्यासाठी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली असून, त्यामध्ये २० रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांना कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झाला आहे की नाही, याची माहिती अजून समोर आलेली नाही.
“भारतात नव्या प्रकाराच्या विषाणूचं संक्रमण झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, आता आढळून येणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या करणं अत्यावश्यक झालेलं आहे. कारण आतापर्यंत आपण हे बघत होतो की, रुग्ण पॉझिटिव्ह आहे की नाही. आता आपल्याला विषाणूच्या जेनेटिक सीक्वेन्सही बघण्याची गरज पडणार आहे. विशेषतः जे लोक ब्रिटनमधून येत आहेत, त्यांच्यामध्ये नव्या प्रकाराच्या विषाणूचं जेनेटिक सीक्वेन्स तर नाही ना. त्याचबरोबर त्यांच्या हा विषाणू आढळून आला, तर त्यांचं विलगीकरण करून, त्यांची देखरेख जास्त करावी लागणार आहे. ज्यामुळे सामूहिक स्वरूपात याचा प्रसार होऊ नये,” असं एम्सचे संचालक गुलेरिया यांनी म्हटलं आहे.