मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे. अशावेळी राज्यासमोर अजून एक आव्हान उभं राहिलंय. मुंबईसह राज्यात पुढील ५ ते ६ दिवस पुरेल एवढाचा रक्ताचा साठा शिल्लक असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. तसंच नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
राजेंद्र शिंगणे यांनी मुंबईसह राज्यातील रक्तसाठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना संपूर्ण माहिती दिली. ‘मी आज मुंबई आणि राज्यात इतर ठिकाणाच्या ब्लड बँकांची माहिती घेतली. पुढील सहा ते सात दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा सध्या आहे, राज्यात कोरोना सुरू झाल्यापासून रक्त पुरवठा कमी झाला आहे’ अशी माहिती शिंगणे यांनी दिली. तसंच, रक्तसाठा कमी होत असल्यामुळे आम्ही वेळोवेळी लोकांना आवाहन केले आहे, नियमित रक्तदात्यांनी रक्तदानाचे शिबिर आयोजित करावे. राजकीय नेत्यांनीही त्यांचे वाढदिवस साजरा होत असताना रक्तदान शिबिर आयोजित करावे, असं आवाहनही शिंगणे यांनी केले आहे.
दरम्यान, एप्रिल महिन्याच्या सर्व दिवशी कोरोना लसीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खासकरुन सरकारी सुट्ट्यांच्या दिवशीही लसीकरण केले जाणार आहे. हा आदेश सरकारी आणि खासगी दोन्ही लसीकरण केंद्रांसाठी लागू असणार आहे.