मुंबई (वृत्तसंस्था) ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास तात्काळ थांबवा, असे आदेश ठाण्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाने महाराष्ट्र एटीएसला दिले आहेत.
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र ATS ला आणखी एक झटका मिळाला आहे. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी पथकाचा तपास सुरू होता. मात्र आता हा तपास ATS ने थांबवण्याचे आदेश ठाणे कोर्टाने दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास NIA म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेला सोपविला होता. मात्र ATS चाही तपास सुरू होता. त्यामुळे NIA कडे तपास आलेला असतानाही एटीएस तपास करत आहे आणि आरोपींची कोठडी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला तात्काळ थांबवून कागदपत्रे आमच्याकडे सोपवावीत, अशी विनंती करणारी याचिका एनआयएने ठाणे कोर्टात केली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी ठाण्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाने ATS ला मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाच्या तपासातली कागदपत्रे NIA कडे देण्यासही सांगण्यात आले आहे.
















