जळगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा मुलगा विक्रम यांच्या लग्नाला राज्याचे अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती होते. यावेळी वधूवरांना आशीर्वाद देताना अनेकांनी मनोगत व्यक्त केले. आमचा २५ वर्षांचा संसार मोडला असला तरी प्रेम कायम असल्याची जाहीर कबुलीच भाजप आमदार आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी देवून टाकली.
काल शिवसेनेच्या दोन दिग्गज नेत्यांच्या घरी लगीनघाई होती. खासदार संजय राऊत हे वधूपित्याच्या भुमिकेत तर मंत्री गुलाबराव पाटील हे वरपिता होते. शिवसेना नेते आणि उपनेत्यांच्या घरी या दोन्ही सोहळ्यांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा मुलगा विक्रम यांच्या लग्नाला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादासाहेब भुसे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, युवासेना सचिव वरूण सरदेसाई, भाजप आमदार आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार, खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वधूवरांना आशीर्वाद देताना अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
त्यावेळी महाजन म्हणाले, वरपिता गुलाबराव पाटील आमचे जुने मित्र आहेत. त्यांनी आणि आम्ही तब्बल २५ वर्षे संसार केला पण जयवंतराव तुम्ही तो मोडलात. पण आता संसार मोडला असला आमचे शिवसेनेवर आजही प्रेम कायम आहे. महाजन यांच्या या जाहीर कबुलीनंतर उपस्थित जयंत पाटील यांच्यासह सर्वच मंडळीत हास्याचे फवारे उडाले.