रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वडगाव शिवारात तीन शेतकऱ्यांचे तब्बल साडेचार हजार केळी खोड कापून फेकल्याने १० लाखांचे नुकसान झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. यांनतर संतप्त शेतकऱ्यांनी वाघोदा चिनावल मार्गावर रास्ता रोको सुरू केल्याची माहिती मिळताच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळ गाठले. शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करू असे आश्वासन दिले. दरम्यान, तीन दिवसांत आरोपींना पकडल्यास आत्महत्या करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
या संदर्भात अधिक असे की, वडगाव शिवारातील पंकज भागवत नारखेडे (चिनावल) यांच्या शेतातील नवतीचे १७००, व वडगाव येथील डॉ. मनोहर नारायण पाटील यांचे ३०० आणि दगडू पाटील यांचे २५०० म्हणजेच तिघांचे मिळून ४५०० केळीचे खोड पाच ते सहा माथेफिरूंनी तोडून फेकले. शनिवारी सकाळी ८ वाजता दगडू पाटील यांच्या लक्षात हा प्रकार येताच शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. परिणामी चिनावल, निंभोरा, वडगाव, विवरे बुद्रुक, वाघोदा येथील सुमारे साडेतीनशे शेतकरी रस्त्यावर उतरले. त्यांनी वडगाव व वाघोदाजवळ दुपारी १ वाजेपासून ५० मिनिटे रास्ता रोको केला. शेतकऱ्यांनी वाघोदा – चिनावल रस्त्यावर तासभर केलेले आंदोलन अश्वसानंतर मागे घेतले.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, श्रीकांत सरोदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, पंकज नारखेडे, डॉ.मनोहर पाटील, दगडू पाटील, योगेश बोरोले, कैलास भंगाळे, फैजपूर माजी नगराध्यक्ष नीलेश राणे उपस्थित होते. अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे उपस्थित होते. डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी गाठून झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. याप्रकरणी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांना त्वरित शासकीय मदत मिळावी यासाठी अशी मागणी करणार असल्याचे आमदार शिरीष चौधरींनी सांगितले.