मुंबई (वृत्तसंस्था) बजाज ऑटोपाठोपाठ आता प्रसिद्ध बिस्कीट कंपनी पार्लेनेही टीआरपी घोटाळ्यातील ‘त्या’ तीन वृत्तवाहिन्यांना जाहिरात देणार नसल्याचे जाहीर केले आहे.
मुंबई पोलिसांनी मागील आठवड्यातच टीआरपी घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर बजाज ऑटोपाठोपाठ आता बिस्किटांचे उत्पादन करणाऱ्या पार्ले कंपनीनेही काही वृत्तवाहिन्यांवर आपल्या जाहिराती न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. द्वेष पसरवणाऱ्या वृत्तवाहिन्यांना जाहिराती न देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कृष्णराव बुद्ध यांनी दिली. ते म्हणाले की, आम्ही अशी शक्यता पडताळत आहोत, ज्यात इतर जाहिरातदार एकत्र येतील आणि वृत्तवाहिन्यांवर जाहिराती देण्याच्या आपल्या खर्चाला आळा घालतील, जेणेकरुन वृत्तवाहिन्यांना स्पष्ट संकेत जाईल की, त्यांना आपल्या मजकुरात बदल करणे गरजेचे आहे. आक्रमकता आणि द्वेष वाढवण्यास प्रोत्साहन देणाऱ्या वाहिन्यांवर आम्हाला खर्च करायचा नाही, कारण ते आमचे ग्राहक नाहीत.