अडावद ता. चोपडा (प्रतिनिधी) अंकलेश्वर बुऱ्हाणपूर राज्य महामार्गावर सुरत बुऱ्हाणपूर बस अडावदहुन यावलकडे जात असताना मोहन नाल्याजवळ प्रवासी बस कंटेनरला धडक दिल्याची घटना घडली आहे. यात नऊ जण जखमी झाले असून लहान मुले, वृद्ध, महिला यांचा समावेश आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दि.१५ रोजी दुपारी ४ वाजता मध्यप्रदेश परिवहन मंडळाची मान्यता असलेल्या एम.पी. ६८ पी. २७० या प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुरत-बुऱ्हाणपूर बसने अडावद पंचक दरम्यान लोणी शिवारातील मोहन नाल्याच्या पुलाजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वाराला वाचवताना पुढे चालणाऱ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बस मधील नऊ प्रवासी जखमी झाले. त्यात नबाब रुबाब खाटीक (वय ५०) यावल, गोकुळ प्रताप पाटील (वय ३८) चोपडा,
निर्मला एकनाथ चौधरी (वय ४५) धानोरा, उज्वला निलेश पाटील (वय ३८) धानोरा, भावेश शरद भामरे (वय १२) मेहरगाव, राजाराम भागा चव्हाण (वय ६५) धुळे, आशा प्रदीप भामरे (वय ३५) मेहरगाव, रामचंद्र बळीराम सोनवणे (वय ५०) हिंगोणा, मंगला शंकर डोळे (वय ५०) धुळे हे जखमी झाले.
यावेळी लोणी पोलीस पाटील नरेंद्र पाटील यांनी १०८ बोलवून ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेत बसविले. त्यांचेवर धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आरोग्य सेविका भारती सोनवणे , भिकुबाई बोदडे, निशा वळवी, मोनाली पाटील, शिपाई विलास पवार, युवा प्रशिक्षणार्थी निखिल सोनवणे यांनी सर्व जखमी रुग्णांवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय महाविद्यालयात रवानगी करण्यात आले.
घटनास्थळी अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ , हवालदार सुनिल तायडे, फिरोज तडवी, अनिल पिसाळ, शेषराव तोरे शुभम बाविस्कर यांनी धाव घेत दोन्ही बाजुंनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. तसेच लक्ष्मण गुरव अडावद, धिरेंद्र पाटील, शैलेश पाटील, सौरव पाटील पंचक या तरुणांनी रस्त्यावर पडलेल्या वाहनाच्या काचांचा थर निंबाच्या पानांनी साफ केला. त्यांचे येणाऱ्या जाणाऱ्यांनी कौतुक केले.
प्रवासी बसचा पुढील भागाचा चेंदामेंदा
सदर प्रवासी बसने दिलेली धडक इतक्या जोरदार होती की बसचा पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला सुदैवाने जीवीत हानी टाळली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.