अहमदनगर (वृत्तसंस्था) केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची केलेल्या अवस्थेवरून अण्णा गप्प का आहेत ? झोपले की काय? असे सवाल समाज माध्यमांमधून केला जात आहेत. त्यावर, आता अण्णांनी उत्तर दिलंय. ‘जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे, मी एकटाच काय करू?, असा प्रतिप्रश्न अण्णांनी केला आहे.
देश बचाव जनआंदोलन समितीनं गेल्या आठवड्यात पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या विविध प्रश्नांवर हजारे यांनी भूमिका मांडावी, आंदोलनासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली होती. अन्यथा राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळं हजारे यांच्याकडून समितीला चर्चेला येण्याची निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानुसार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करताना हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
हजारे म्हणाले, ‘माझं वय आता ८४ वर्षे आहे. मी कधीपर्यंत लढू? देश बचाव जनआंदोलन समिती युवकांनी स्थापन केली. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही लढा उभा करा, मी तुमच्यासोबत अवश्य येईल. आतापर्यंत आपण आंदोलनं करून लोकहिताचे कायदे मंजूर करून घेतले. मात्र, आता सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात येत आहेत. मागणी नसताना अनेक कायदे करण्यात येत आहेत. जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे. त्यामुळं सरकारलाही हे करणं शक्य होत आहे. जनतेनं आवाज उठवून सरकार बदलण्याची ताकद उभी केली पाहिजे, तेव्हाच सरकार झुकेल आणि जाचक कायदे रद्द केले जातील,’ असंही हजारे म्हणाले. यावर कार्यकर्त्यांनी हजारे यांना पूर्वीच्या आंदोलनांची आठवण करून दिली. ‘तुमच्या शब्दाला दिल्लीत वजन आहे. तुम्ही दिल्लीला हलवू शकता, त्यामुळं आम्ही तुमच्याकडं आलो आहोत,’ असं कार्यकर्ते हजारे यांना म्हणाले.