जळगाव (प्रतिनिधी) पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. जनतेने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं आहे,” अशी प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पश्चिम बंगाल निकालावर दिली आहे.
“पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची दोन तृतीयांश मतदानाकडे सध्या वाटचाल सुरू आहे अशा स्वरूपाचं चित्र आहे. पश्चिम बंगालची निवडणूक भाजपाने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पश्चिम बंगालच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व भाजपाचे देशभरातील प्रमुख पदाधिकारी तिथे गेले होते. या ना त्या प्रकारे पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता स्थापन करावी यासाठी भाजपा मैदानात उतरली होती. परंतू पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी जनतेने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं आहे,” असं एकनाथराव खडसे यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांकडून ममता बॅनर्जींचे अभिनंदन
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी त्यांनी लोकांच्या भल्यासाठी तसंच कोरोनाशी लढण्यासाठी एकत्रित काम करुया असंही म्हटलं आहे.
पश्चिम बंगालची स्थिती काय?
आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे. तर ‘अब की बार २०० पार’च्या वल्गना करणारा भाजप १०० जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. कोरोनामुळे मतमोजणीची प्रक्रिया संथरित्या सुरु आहे. त्यामुळे निकाल पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र, तूर्तास तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आक्रमण थोपवून पश्चिम बंगालचा गड राखला, असेच म्हणावे लागेल.
















