अहमदनगर (वृत्तसंस्था) रोहित पवार यांनी स्वतः ला ‘सामाजिक गुंड’ म्हणविले आहे. मतदारसंघात मागील दीड वर्षांत जे काही घडत आहे, त्यावरून ‘ते सामाजिक गुंड आहेत की गुंड हे लोकांनीच ठरवावे,’ असा टोला भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवारांना लगावला आहे.
काही वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी वापरलेला ‘टग्या’ हा शब्द चर्चेत आला होता. ग्रामीण राजकारणाबद्दल बोलताना ते म्हणाले होते. ‘तालुका पातळीवर निवडणूक जिंकण्यासाठी खूप काही करावे लागते. हे येड्यागबाळ्याचे काम नाही. त्यामुळे सन्मार्गी लोक या वाटेकडे फिरकतही नाहीत. या कामासाठी गावाने ओवाळून टाकलेले टगे किंवा अर्कच कामी येतात. मी पण अशाच प्रकारे तालुका पातळीवर निवडून आलो आहे, त्याअर्थी मीसुद्धा टग्याच आहे’. पुढे दीर्घकाळ हा शब्द राजकारणात चर्चेत राहिला होता. आता रोहित पवार यांनी वेगळ्या अर्थाने ‘सामाजिक गुंड’ हा शब्द चर्चेत आणला आहे. ग्रामीण राजकारणावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पूर्वी एकदा स्वत:ला ‘टग्या’ संबोधले होते. त्यांचे पुतणे आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आता वेगळ्या अर्थाने स्वत:ला ‘सामाजिक गुंड’ म्हणविले आहे. याची चर्चा सुरू असतानाच त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी पवारांना टोला लगावला आहे. मतदारसंघात मागील दीड वर्षांत जे काही घडत आहे, त्यावरून ‘ते सामाजिक गुंड आहेत की गुंड हे लोकांनीच ठरवावे,’ टोला शिंदे यांनी लगावला आहे. खर्डा येथे प्रचाराचा प्रारंभ करताना पवार यांनी शिंदे यांच्या टीकेला उत्तर दिले.
ते म्हणाले, ‘निवडणुका बिनविरोध करण्याचा माझा मूळ विचार विरोधकांना पटलाच नाही. गावात गटबाजी नको, लोकांनी एकत्र येऊन विकासाला चालना द्यावी, असा माझा विचार होता. मात्र, ज्यांचे राजकारण गटबाजी करून पोळी भाजण्याचे आहे, त्यांना हे समजणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात सामान्यांचा आवाज दडपून टाकून निवडणुका घेण्याची पद्धत पडली आहे. आता हे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांना कोणी अरेरावी आणि दादागिरीची भाषा करीत असेल तर त्यांनी लक्षात घ्यावे की माझ्यासारखा ‘सामाजिक गुंड’ कोणी नाही. लोकशाही मार्गाने निवडणुका होऊ द्याव्यात, त्यातच सर्वांचे भले आहे,’ असेही पवार यांनी सुनावले.
भाजपच्या प्रचार सभेत बोलताना प्रा. शिंदे यांनी पवार यांना उत्तर दिले आहे. शिंदे म्हणाले, ‘हा मतदासंघ गेल्या २५ ते ३० वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. विधानसभा निवडणुकीत भुलभुलय्या केला गेला. आता लोक त्याला बळी पडणार नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर हा मतदारसंघ भाजपचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होईल. मागील एक दीड वर्षात या मतदारसंघात जे काही सुरू आहे, त्यावरून ते ‘समाज गुंड’ आहेत की ‘गुंड’ हे लोकांच्या चांगलेच लक्षात आले आहे. असेही शिंदे म्हणाले.