नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर अपात्र आणि राजीनामा दिलेल्या आमदारांना ५ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी याचिका दाखल केली आहे.
या संबंधी प्रलंबित प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यातील राजकरणात एक नवा ट्रेंड विकसित झाला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आमीष दाखवून राजीनामा देण्यास जबरदस्ती करून सरकार पाडले जाते. तर सरकार राजीनामा देणाऱ्या नवीन आमदारांना मंत्रीपदे देत आहे. तसेच पोटनिवडणूक लढवण्यासाठी तिकिटही दिले जात असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे.
महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडी पाहता या गोष्टींवर आळा घालण्यासाठी न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. यासाठी सरन्यायाधीश सए बोबडे आणि न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि व्ही रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने नोटीस बजावली होती. राज्यघटनेतील दहाव्या अनुसुचीप्रमाणे, निलंबित केलेल्या सदस्याला पुढील कालावधीसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे.