सोलापूर (वृत्तसंस्था) गृह विभागातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये सात हजार २३१ पदांची पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पदभरतीवेळी लेखीऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. गोळाफेक, पुलअप्स, लांबउडी आणि १०० मीटर धावणे अशा चाचण्या उमेदवारांना पार कराव्या लागणार असल्याची माहिती गृह विभागाच्या विश्वसनिय सूत्रांनी दिली. ग्रामीण भागातील तरुणांना पोलिस सेवेत संधी मिळावी, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याच्या गृह विभागात मागील दोन वर्षांत नवीन पदांची भरती झालेली नाही. २०१९ मध्ये जाहीर झालेली पाच हजार पदांची भरती प्रक्रिया तब्बल दीड वर्षे चालली. आता २०२० मध्ये घोषित झालेल्या पदभरतीला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. गृह विभागाने काही महिन्यांपूर्वी पोलिस नाईक पद रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पोलिस भरती प्रक्रियेतील बिंदुनामावली पुन्हा बदलावी लागली. दुसरीकडे पोलिस नाईक म्हणून कार्यरत असलेल्यांना पोलिस हवालदारपदी नियुक्ती करताना तेवढ्या जागा रिक्त नाहीत. त्यामुळे अजून अनेकजणांना त्याच पदावर काम करावे लागत आहे. या सर्व बाबींमुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. पण, आता त्या बाबींची पूर्तता झाल्याने पुढील महिन्यात भरती प्रक्रियेला सुरवात होईल, असा विश्वासही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. तत्पूर्वी, पदभरतीवेळी लेखीऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. गोळाफेक, पुलअप्स, लांबउडी आणि १०० मीटर धावणे अशा चाचण्या उमेदवारांना पार कराव्या लागणार आहेत.
ग्रामीण भागातील तरुणांना पोलिस भरतीत संधी मिळावी म्हणून तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पहिल्यांदा लेखीऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. पुन्हा त्यात बदल करून पहिल्यांदा लेखी चाचणी घेण्याचा निर्णय झाला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारने भरती पध्दतीत बदल करून सर्वप्रथम मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून ग्रामीण तरूणांना पोलिस भरतीत सर्वाधिक संधी मिळेल हा हेतू होता. पण, त्याची अंमलबजावणी आता आगामी भरतीवेळी केली जाणार आहे.
- पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा द्यावी लागणार मैदानी चाचणी
- राज्याच्या गृह विभागात तब्बल ४९ हजार ५०० पदे रिक्त
- पहिल्या टप्प्यात २०२० मधील सात हजार २३१ पदांची होणार भरती
- पुढील टप्प्यात २०२१ व २०२२ मधील रिक्तपदांची एकत्रित होणार भरती
- पोलिस नाईक झालेले होणार हवालदार; गृह विभागाने रद्द केले नाईक पद