मुंबई (वृत्तसंस्था) अनेकांनी राज्यात मंदिरं उघडा या मागणीसाठी आंदोलनं केली. तुम्ही आंदोलनं करा, अवश्य करा. पण कोरोनाविरुद्ध आंदोलन करा. आपण राजकारण करतो आणि त्यात जीव मात्र सामान्य जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि भाजपला फटकारले आहे.
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या “माझा डॉक्टर” या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी राज ठाकरेंसह भाजपलाही फटकारलं. मला थोडसं आश्चर्य वाटतं. आपण सर्व गोष्टींची काळजी घेत असताना काही लोकांना अनेक गोष्टींची घाई झाली आहे. हे उघडा, ते उघडा, अमूक उघडा, तमूक उघडा, हे असं आहे, ते तसं आहे, असं काही लोक म्हणत आहेत. पण, मी सर्वांना सांगतो, थोडा धीर धरा. संयम धरा. आपण ज्या गोष्टी उघडत आहोत त्या पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ नये याची खात्री पटवून आपण पुढे जात आहोत. मग अशावेळी घाई गर्दी केली तर आपण आणखी काही वर्षे, काही महिने या संकटातून बाहेरच पडू शकणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना याचा विचार सर्वांनीच करायला हवा. अगदी राजकारण्यांनीही, आम्ही ही हा विचार करायला हवा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं. पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका, असं आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं. आंदोलन करायचे तर कोरोना विरुद्ध करा, असा टोलाही त्यांनी लगावला.
तिसरी लाट येऊच नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजचे. दुर्देवाने ती आलीच तर त्याची घातकता कमी व्हावी यादृष्टीने उपाययोजना आणि प्रयत्न सुरू आहेत. आज कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नाही आणि तिसऱ्या लाटेचा धोका सांगितला जात आहे. जगभरात तिसऱ्या लाटेचे थैमान सुरु आहे. अशा परिस्थितीत वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. तिसरी लाट आलीच तर त्याची घातकता कमी व्हावी हा त्यामागचा प्रयत्न आहे. आपला शत्रू अजून पूर्णपणे पराभूत झालेला नाही. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहणे आवश्यक, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.