नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजकारणासाठी धर्माच्या रूपाने अफूची गोळी देण्यासारखा हा प्रकार आहे. हे केवळ भाजपच्या बाजूने नव्हे, तर असदुद्दीन ओवेसी देखील तेच करीत असल्याची टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.
अयोध्या आणि राम मंदिराचा मुद्दा वेगळा होता, आजचे प्रश्न वेगळे आहेत. ते आहेत बेरोजगारी, कोरोना-ओमायक्रॉन, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, ही आक्रमणे होत असताना आपण सातत्याने धर्माचे विषय घेऊन लोकांना प्रभावित करणे, मतांचे ध्रुवीकरण करणे हे सर्व उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी सुरू आहे, असा पलटवार शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन केले. त्याबद्दल विचारले असता सावंत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. राजकारणासाठी धर्माच्या रूपाने अफूची गोळी देण्यासारखा हा प्रकार आहे. हे केवळ भाजपच्या बाजूने नव्हे, तर असदुद्दीन ओवेसी देखील तेच करीत आहेत. ते सध्या भाजपचे काम करीत असल्यासारखे वाटते. भाजपला हवे ते घडविण्याचे काम ओवेसी करतात.
संजय राऊत यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल झाला हे सूडाचे राजकारण आहे. मुंबईच्या महापौरांच्या अपमानानंतर आशिष शेलार यांना लक्ष्य केल्यानंतर दिल्लीत राऊत यांच्यावर गुन्हा दाखल होतो. मुळात राऊत यांनी वापरलेल्या शब्दाचा अर्थ हा मूर्ख किंवा महामूर्ख असा होतो. त्यामुळे कुणाचा अपमान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा जाणीवपूर्वक केलेला छळ आहे. बुद्धिबळातील प्याद्यांसारखी आव्हाने देऊ नका, असा इशारा सावंत यांनी दिला आहे.