जयपूर (वृत्तसंस्था) 50 हून अधिक मुलींना आपल्या जाळ्यात अडकवणाऱ्या आणि दोन तरुणींची हत्या (Murder) करणाऱ्या आरोपीला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून धक्कादायक खुलासे झाले आहेत. डीसीपी पश्चिम ऋचा तोमर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करत पोलिसांनी मिंटू उर्फ विक्रम याला भिवाडी येथून अटक केली. मिंटूने 23 फेब्रुवारी रोजी गर्लफ्रेंडचा गळा आवळून खून केला होता.
आर्मी ऑफिसर, आयकर अधिकारी म्हणवून मुलींना जाळ्यात फसवायचा
आरोपी आपली ओळख बदलायचा आणि घटनेनंतर त्याचा ठावठिकाणाही बदलायचा. कधी तो आर्मी ऑफिसर बनून मुलींना आपल्या जाळ्यात फसवत असे, तर कधी स्वतःला आयकर अधिकारी म्हणवून घेत असे. मिंटूने अनेक मुलींशी शारीरिक संबंध ठेवल्याची कबुलीही दिली आहे. आरोपी काही काळ चंदिगड आणि मध्य प्रदेशातही वास्तव्यास होता. तिथे त्याने आयकर अधिकारी असल्याचं भासवून अनेक मुलींच्या जीवाशी खेळ केला. त्याच्यावर अलवरमध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हाही दाखल आहे, ज्यामध्ये तो वॉन्टेड आहे.
गर्लफ्रेंडची हत्या केली
पोलिसांनी सांगितलं की, आरोपी मिंटू त्याची गर्लफ्रेंड रोशनीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. दोघांची भेट एका हॉटेलमध्ये झाली होती, तेव्हापासून दोघे एकत्र राहत होते. रोशनी स्पा सेंटरमध्ये काम करायची आणि हॉटेल्समध्येही जायची, हे मिंटूला आवडत नव्हतं. त्याने रोशनीला काम सोडण्यासही सांगितलं होतं, मात्र तिने हे न ऐकल्याने आरोपीनी तिची हत्या केली.
लाखो रुपयेही हडपले
रोशनीच्या वडिलांना जामीन मिळवून देण्याच्या नावाखाली त्याने लाखो रुपये हडप केल्याचंही तपासात समोर आलं आहे. मृत तरुणीचे वडील एका खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. एवढंच नाही तर मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथेही एका मुलीची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकल्याची कबुली आरोपीने दिली आहे. पूजा शर्मा असं खून झालेल्या मुलीचं नाव आहे. आरोपीनी एप्रिल 2021 मध्ये ही हत्या केली होती.