चित्रकूट (वृत्तसंस्था) घरातून पळून जाऊन लग्न करण्यास नकार दिल्याने प्रियकरानेच प्रेयसीची निर्घृण हत्या केली (Girlfriend’s Murder). उत्तर प्रदेशच्या चित्रकूट येथील मऊ ठाण्याच्या क्षेत्रातल्या हटवा गावात एका मुलीचा डोकं कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात 3 आरोपींना अटक केली आणि या हत्याकांडाचा संपूर्ण खुलासा केला.
पोलीस अधीक्षक धवल जयस्वाल म्हणाले की, हटवा गावातील एका तरुणीचं गावातच राहणाऱ्या विष्णू नावाच्या व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. मागील १ वर्षापासून दोघंही रिलेशनशीपमध्ये होते. ज्याची भनक नातेवाईकांना लागली. त्यामुळे प्रियकर विष्णूच्या घरच्यांनी त्याला बांदा जिल्ह्यातील नातेवाईकांकडे राहण्यास पाठवले. तर प्रेयसीच्या घरच्यांनी तिचं लग्न मध्य प्रदेशातील टीकमगड येथे १६ फेब्रुवारीला लग्न निश्चित केले होते. प्रेयसीचं लग्न ठरल्याचं प्रियकराला कळालं. त्यानंतर ७ फेब्रुवारीला तो गावी परतला आणि प्रेयसीला गिफ्ट देण्याच्या बहाण्यानं एका निर्माणधीन इमारतीत भेटायला बोलावलं.
प्रियकर विष्णू आणि प्रेयसीची भेट झाली. तेव्हा त्याने प्रेयसीवर पळून जाऊन लग्न करण्यास दबाव टाकला. ज्यावर प्रेयसीनं पळून जात लग्न करण्यास नकार दिला. तेव्हा प्रियकराला राग अनावर झाला त्याने दोन जणांसोबत मिळून प्रेयसीची हत्या केली. त्यानंतर मृतदेह लपवून ठेवला. आरोपीनं पहिल्यांदा मुलीचा गळा आवळला त्यानंतर कुन्हाडीनं तिचं शिर शरीरापासून वेगळं केले. त्यानंतर आरोपी प्रियकरानं स्वतःचा आणि तिचा फोन शेतात लपवला. त्यानंतर पुन्हा नातेवाईकांकडे निघून गेला. मृत मुलीच्या घरच्यांनी प्रियकरावर अपहरणाचा आरोप लावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर कसून चौकशी सुरू केली. १ मार्चला मुलीचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर आरोपी प्रियकराला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी प्रियकराच्या सांगण्यावरून पोलिसांनी शेतातून दोघांचे मोबाईल जप्त केले आणि गुन्ह्यात साथ देणाऱ्या इतर आरोपींनाही जेरबंद केले.