नांदेड (वृत्तसंस्था) राज्यकर्त्यांनी आमच्या मतांचा बाजार मांडला असून आमचा मतदानाचा हक्क शासनाने परत घ्यावा, या मागणीसाठी तरुणांनी बोटाला चुना लावून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे केलेलं आंदोलन राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
या तरुणांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, आम्ही प्रत्येक निवडणुकीत उत्साहात मतदान करतो. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय मंडळींनी आमच्या मतांची चेष्टा मांडली आहे. आम्ही २०१९ मध्ये एकदा मतदान केले. परंतु सत्तेसाठी वाट्टेल ते करणाऱ्या राजकारण्यांनी तीन मुख्यमंत्री आमच्या माथी मारले हा सर्व प्रकार लोकशाहीवर दरोडा टाकण्यासारखा आहे.
काल महाराष्ट्रात परत एक शपथविधी झाला. हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असून लोकशाहीचा खून करणारा आहे. हे सर्व पाहून लोकशाहीवरील आमचा विश्वास उडाला आहे. मतदान कुणालाही केले तरी सर्व पक्ष मात्र सत्तेसाठी एकमेकांच्या गळ्यात गळे घालत आहेत. त्यामुळे लोकशाहीने आम्हाला दिलेला मतांचा अधिकार शासनाने परत घ्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी महेंद्र देमगुंडे, शंकर स्वामी, अरुण धुतराज, गजानन सरोदे, हनमंत पटणे, माधव स्वामी, प्रकाश केटिग, दिलीप कळसकर, श्रीराम पटाईत यांची उपस्थिती होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने दिले आहे.