लाहोर (वृत्तसंस्था) पाकिस्तानातील महापुरामुळे देशातील जवळपास 1,300 लोकांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पाकिस्तानमध्ये गेल्या 24 तासांत 29 जणांचा मृत्यू झाला असून जूनपासून देशातील मृतांची संख्या 1,290 वर पोहोचल्याची माहिती दिली आहे.
पाकिस्तानचा मोठा भाग पाण्याखाली आहे, विशेषत: दक्षिणेकडील बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा आणि सिंध प्रांतांत कहर पाहायला मिळत आहे. जिओ न्यूजच्या अहवालानुसार, सिंधमध्ये किमान 180 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर खैबर पख्तूनख्वा (138) आणि बलुचिस्तान (125) आहेत. याशिवाय या पुरात किमान 1,468,019 घरांचे अंशत: किंवा पूर्ण नुकसान झाले आहे. पाकिस्तानमध्ये जनजीवन विस्कळीत झालं असून पुराचा तब्बल 3 कोटी नागरिकांना फटका बसलाय. पाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन दलाने याआधी दिलेल्या माहितीनुसार, तीन हजार किलोमीटर पेक्षा अधिक रस्ते, 150 पूल आणि तब्बल सात लाख घरं वाहून गेली आहेत. पुरात रस्ते आणि पुल वाहून गेले असल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. शेतीचेही मोठे नुकसान झाले असून मोठय़ा प्रमाणात प्राण्यांचा बळी गेला आहे.