डेहराडून (वृत्तसंस्था) उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक भागांना भयानक पुराचा कहर सहन करावा लागत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे तर अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. यामध्ये ४७ लोकांचा मृत्यू झाला असून मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे.
राज्य शासन तसेच लष्कराकडून बचाव कार्याला वेग देण्यात आला असून लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात येत आहे. राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी एकूण पाच जणांचा जीव गेला होता तर मंगळवारी ४२ जणांचा जीव गेला. राज्याला विशेषत: कुमाऊ भागामध्ये ढगफुटी आणि भूस्खलनानंतर अनेक लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.
राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आणि प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या. राज्यातील अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्राकडून उत्तराखंडला सर्वोतपरी मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं आहे.