तिरुवअनंतपूरम (वृत्तसंस्था) केरळमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू तर जवळपास १२ जण बेपत्ता झाले असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीय.
केरळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता केरळ किनारपट्टीवर पोहोचलं आहे. त्यामुळे केरळात पावसाचा जोर वाढला आहे. सध्या दक्षिण आणि मध्य केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्रिवेंद्रम, कोल्लम, पदानमटिट्टा, कोट्टायम, इडुक्की जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोट्टायम जिल्ह्यातच आतापर्यंत ६ लोकांचा मृत्यू झाला असून १३ जण अद्याप बेपत्ता आहेत.
केरळमध्ये झालेल्या अतीमुसळधार पावसानंतर पठानमथिट्टामध्ये मनियार धरणाचे दरवाजे खोलण्यात आले. ज्यामुळं नजीकच्या भागामध्ये पाणी शिरलं. केरळमधील डोंगराळ भागात सैन्य आणि वायुदलाची पथकं मदतीसाठी पोहोचली आहेत. केरळ पट्ट्यामध्ये मासेमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारप्रमाणेच रविवारीही इथं जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अनेक भागांत मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. लष्कराची एक तुकडी कोट्टायममध्ये तैनात आहे. तर दुसरी तुकडी त्रिवेंद्रममध्ये तैनात आहे. एनडीआरएफची ७ पथकांनीही मदत आणि बचाव कार्य सुरु केलं आहे. एअर फोर्सलाही मदत कार्यासाठी तयार राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
















