मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभेच्या निवडणूकीची मतमोजणी लांबली आहे, मतदानावर एकमेकांकडून आक्षेप घेतल्यानंतर मतमोजणी लांबली असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हरकतींवर निर्णय आला नसल्याने प्रक्रियेला उशीर होत आहे. निवडणूक आयोगाला यासंबंधी ईमेल पाठवण्यात आला आहे, त्याचा निर्णय आल्यानंतर मतमोजणी सुरू होणार आहे.
राज्यसभा निवडणुकीची धामधूम सध्या राज्यात सुरू आहे. आज राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. यासाठी भाजपाकडून धनंजय महाडिक, अनिल बोंडे, पीयूष गोयल हे रिंगणात आहेत. शिवसेनेकडून संजय पवार आणि संजय राऊत, काँग्रेसक़डून इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल उमेदवार आहेत. भाजपने त्यांच्या गोटातून चौथा उमेदवार दिल्याने यंदा चुरस वाढली आहे. निवडणुकीपूर्वी झालेल्या नाट्यमय घडामोडीमुळे महाराष्ट्रातील राजकारणाला दिवसेंदिवस रंग चढत आहेत.
भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली, सुहास कांदे, यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका दुसर्यांना दाखवली असा आक्षेप घेत त्यांचे मत रद्द करण्याची मागणी भाजपने केली होती. त्यानंतर घडामोडींना वेग आला आहे.