जालना (वृत्तसंस्था) भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातील जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची झडती घेतल्याप्रकरणी दोन फोजदारांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी ही कारवाई रावसाहेब दानवे यांच्या तक्रारीवरुन केली.
पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल, पोलीस उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग रायसिंग सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल सचिन उत्तमराव तिडके आणि पोलीस कॉन्स्टेबल शाबान जलाल तडवी अशी निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत.
११ जून रोजी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणती कायदेशीर परवानगी न घेता जालना जिल्ह्यातील जाफराबाद इथल्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यलयाची तपासणी केली, असा आरोप आहे. यावेळी या पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसंच कामकाजाच्या संचिका देखील सोबत नेल्या, अशी तक्रार रावसाहेब दानवे यांनी केली होती. या प्रकरणी जालना जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी चौकशी करुन दोन पोलीस उपनिरीक्षकांसह पाच जणांचं निलंबन केलं.
ही तपासणी करुन नेमकं काय निष्पन्न झालं याचा खुलासा रावसाहेब दानवे यांनी मागितला होता. या प्रकरणी चौकशी करुन पोलिसांचं वर्तन बेकायदेशीर आणि बेशिस्तपणाचं असल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सोमवारी (१४ जून) ही कारवाई केली.
याप्रकरणी दानवे यांच्या तक्रारीनंतर, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. याप्रकरणी कार्यालयीन चौकशी केली असता, संबंधित पोलीसांचं वर्तन बेकायदेशीर आणि बेशिस्तपणाचं असल्याची माहिती पोलीस अधीक्षक देशमुख यांनी दिली आहे. १४ जून रोजी संबंधित पाचही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. संबंधित झडतीतून नेमकं काय निष्पन्न झालं? याचा खुलासा करावा, अशी मागणीही दानवे यांनी केली आहे.