मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून जिल्हा परिषदेच्या सेवेत जी नोकरभरती करावयाची आहे ती तातडीने सुरु करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी बुधवारी सभागृहात केली होती. त्यावर उपसभापतींनी खडसे यांनी जी सूचना केली आहे. त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. शासनाने या संदर्भात एका महिन्याच्या आत कार्यवाही करुन मला अवगत करावे, असेही निर्देश उपसभापतींनी दिले आहेत.
एकनाथराव खडसे यांनी बुधवारी सभागृहात राज्यातील ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेत पदोन्नती द्यावी, अशा स्वरुपाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. राज्य शासनाने सेवा ज्येष्ठता यादी तयार केलेली आहे. सेवा ज्येष्ठता यादीमध्ये जे सेवा ज्येष्ठतेनुसार येत असतील अशा कर्मचाऱ्यांसाठी ४५ वर्षे वयाची मर्यादा धरुन त्यांना नोकरीत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आणि त्यानुसार काही ठिकाणी ही प्रक्रिया पूर्णही करण्यात आली.
जळगाव जिल्ह्यात अशा प्रकारे काही प्रमाणात भरती करण्यात आली. परंतु मागील ५-६ वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात अशा स्वरुपाची पदोन्नती म्हणजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून भरतीची प्रक्रिया पूर्णपणे थांबलेली आहे. परिणाम असा झालेला आहे की, ग्रामपंचायतीच्या बऱ्याच कर्मचाऱ्यांचे भरतीचे वय निघून गेलेले आहे, ते पात्र ठरत नाहीत. त्यामुळे त्यांची नियुक्ती होऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. राज्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून जिल्हा परिषदेच्या सेवेत जी नोकरभरती करावयाची आहे ती तातडीने सुरु करावी. प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यात याद्या तयार आहेत. परंतु प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे परिणाम होत आहे. शासनाने या संदर्भात तातडीने कार्यवाही करुन त्यांना शासन सेवेत समाविष्ट करुन घ्यावे, अशी विनंती खडसे यांनी केली होती.
त्यावर राज्य शासनाने पात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार जिल्हा परिषदेच्या सेवेत सामावून घेण्याबाबत एकनाथराव खडसे यांनी जी सूचना दिलेली आहे. त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. शासनाने या संदर्भात एका महिन्याच्या आत कार्यवाही करुन मला अवगत करावे, असे निर्देश उपसभापती यांनी दिले आहेत. यामुळे भविष्यात जळगाव जिल्ह्यातील अनेक उमेदवारांना याचा फायदा होईल.