नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. देशात गेल्या २४ तासांत २ लाख ८ हजार ९२१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ४ हजार १५७ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत २ लाख ८ हजार ९२१ नवीन कोरोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २ लाख ९५ हजार ९५५ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या चिंतेत भर घालणाऱ्या मृतांच्या संख्येमध्ये कालच्या तुलनेत वाढ झालीय. गेल्या २४ तासांत देशात ४ हजार १५७ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या ३ लाख ११ हजार ३८८ वर पोहोचली आहे.
देशातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या २५ लाखांच्या खाली आली असून सध्या २४ लाख २९ हजार ५९१ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. देशात कोरोना लसीकरण करण्यात आलेल्यांची संख्या २० कोटी ६ लाख ६२ हजार ४५६ इतकी असल्याचंही आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.
राज्यातली स्थिती
महाराष्ट्रात काल (सोमवारी) ४२,३२० कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर २२,१२२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल ३६१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहेत. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. राज्यात काल एकूण ३,२४,५८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण ५१,८२,५९२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.