चाळीसगाव (प्रतिनिधी) गुरुवारी रात्रभर मुसळधार पावसामुळे डोंगरी व तितूर नद्यांना पूर आला आहे. आज सकाळी नद्यांचे पाणी शिवाजी घाटासह घाटरोडवरील पुलावरुन वाहू लागले आहे.
चाळीसगाव तालुक्यात ढगफूटी सदृष्य पाऊस झाल्याने गेल्यावर्षी ३१ आॕगस्ट रोजी मोठा हाहाकार उडाला होता. खरीप हंगामासह मालमत्ता व पशुधनाचेही मोठे नुकसान झाले होते. यावर्षी मे महिन्यात लोकसहभागातून डोंगरी व तितूर नदीपात्राची स्वच्छता केल्याने पुराचे पाणी संथ गतीने वाहत आहे. मात्र शुक्रवारी आलेल्या पुरामुळे गेल्यावर्षाच्या महापुराच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. तळेगाव व पाटणादेवी परिसरातील डोंगररांगांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने दोघी नद्यांना पहाटे चार वाजता पूर आला आहे.