मुंबई (वृत्तसंस्था) ईडीच्या चौकशीवरून शिवसेना आणि भाजपा हे पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. हवाबाण थेरेपीचा अतिरेक झाला की डोक्यात सडकी हवा जाते. त्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहेत. त्यांचे नाव भाजपा. भाजपाच्या नव्या घटना समितीचा विजय असो. डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य, असा टोला शिवसेनेने सामनामधून भाजपाला लगावला आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचनालयानं (ED) नवे समन्स बजावले आहेत. येत्या ५ जानेवारीला मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहावे, असे निर्देश वर्षा राऊत यांना देण्यात आले आहेत. त्यावरून ईडीची चौकशी आणि भाजपा नेत्यांनी घटनेची करून दिलेली आठवण यावरून शिवसेनेने आजच्या सामनामधील अग्रलेखामधून भाजपावर घणाघाती टीका केली आहे. सीबीआय आणि ईडीसारख्या संस्थांचे अध:पतन सध्या जोरात सुरू आहे. सामनामधील आजच्या अग्रलेखात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्रात ईडी प्रकरण गाजत आहे. महाराष्ट्रातून भाजपाची इडा-पीडा गेल्यानंतर हे ईडी प्रकरण जोर धरू लागले आहे. म्हणजे ईडीचा वापर करून भाजपाविरोधकांना नमवण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. आता ईडीला घाबरून भाजपाच्या कळपात शिरलेल्या एका महात्म्याने ठाकरे सरकार पडण्याचा नवा मुहुर्त सांगितला आहे. आता म्हणे मार्च महिन्यात काही झाले तरी सरकार पडणार हा मुहुर्त त्यांनी ईडीपिडीच्या पंचांगातून काढला की, त्यांना दृष्टांत झाला, हा प्रश्न आहे. एक मात्र खरे की, महाराष्ट्रातील भाजपावाले सत्तास्थापनेसाठी त्या ईडीवर फारच विसंबून राहिले आहेत.
ईडीची नोटिस आली की, चौकशीसाठी संबंधिताने जायलाच हवे. कायद्याचा सन्मान व्हायलाच पाहिजे. कायदा सगळ्यांसाठी समान. दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस म्हणतात ते देखील बरोबरच आहे. कर नाही तर डर कशाला? त्यांचे हे सांगणे बरोबरच आहे. पण या नोटिसा देशभरात फक्त भाजपाविरोधकांना का येतात हा प्रश्न आहे. देशात फक्त भाजपवालेच गंगास्नान करतात आणि बाकीचे लोक गटारस्नान करतात, असे काही आहे काय? शिवसेनेच्या बाबतीत कर नाही तर डर नाही वगैरे ठिकच, पण करून सवरून नामानिराळे राहण्याची आमची अवलाद नाही. जे केले त्याची जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. त्याचे उदाहरण म्हणजे बाबरी विद्ध्वंस. तेथे रणातून पळून गेले ते कर आणि डरचे दाखले देत आहेत. हा विनोदच म्हणावा लागेल.
चंद्रकांत पाटील हे संजय राऊत वगैरे लोकांना घटना मान्य नाही काय असे विचारत आहेत. पाटलांना घटनेची इतकी फिकीर कधीपासून लागून राहिली आहे. त्यांनी तुम्हाला घटना मान्य नाही काय हा प्रश्न राजभवनाच्या दारात उभे राहून जोरात विचारायला हवा. त्यावर आपले राज्यपाल महोदय काय सांगतात हे महाराष्ट्राच्या जनतेला कळवायला हवे. २०२० चे ठाकरे सरकार पाडण्याचे सर्व मुहुर्त आणि प्रयोग फसले आहेत. त्यामुळे राज्यपालांच्या मनातले सरकार येत्या पाच-पंचवीस वर्षांत तरी महाराष्ट्रात येण्याची लक्षणे दिसत नाहीत. मग वाट कसली पाहताय? असा सवालही या अग्रलेखातून विचारला आहे.
मुंबईतील ईडीच्या कार्यालयासमोर हेच भाजप कार्यालय असल्याचा बोर्ड काही जागरूक मंडळींनी ठोकून दिला. त्यामुळे ईडी वगैरे काय ते भाजपवाल्यांनी शिकवण्याची गरज नाही. शरद पवार असतील नाही तर संजय राऊत, खडसे, सरनाईक असतील, नाहीतर महाविकास आघाडीतील इतर कोणी. त्यांच्यावरील कारवाया म्हणजे विकृतीचा कळस आहे. कायद्याच्या अंमलबजावणीचा हेतू शुद्ध असेल तरच तो कायदा जनतेने पाळायचा असतो. बेकायदेशीर आदेश पाळणे हे नागरिकांच्या सनदेमध्ये बसत नाही. सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचे अध:पतन सध्या जोरात सुरू आहे, अशी टीकाही सामनामधून करण्यात आली आहे.
ठाकरे सरकार पडण्याचे सर्व मुहूर्त, प्रयोग २०२० मध्ये फसले आहेत. त्यामुळे राज्यपालांच्या मनातले सरकार येत्या पाच-पंचवीस वर्षांत तरी महाराष्ट्रात येण्याची लक्षणे दिसत नाहीत. मग वाट कसली पाहताय? कुणा कुडमुड्या ज्योतिषाने मार्च-एप्रिलचा मुहूर्त दिला असेल तर तो मूर्खपणाच ठरेल. त्यामुळे ईडी वगैरे काय ते भाजपवाल्यांनी शिकविण्याची गरज नाही. शरद पवार असतील नाहीतर संजय राऊत. खडसे, सरनाईक असतील नाहीतर महाविकास आघाडीतील इतर कोणी, त्यांच्यावरील कारवाया म्हणजे विकृतीचा कळस आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.