बोदवड : सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रत्येक उमेदवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या प्रचारात व्यस्त आहेत. कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न असतो. पण, अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी तर्फे रोहिणी खडसे यांनी आपला प्रचाराचा ताफा थेट शेताच्या बांधावर वळवला. आणि पिकांचे नुकसानीची पाहणी करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी तर्फे रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर झालेली असून त्यांनी काल गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या सुद्धा प्रचाराला लागल्या आहेत. आज शुक्रवार रोजी त्या बोदवड तालुक्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना बोदवड वरून शेलवडकडे जाताना पावसामुळे शेतातील पिकांचे झालेले नुकसान बघून रोहिणी खडसे यांनी आपला प्रचाराचा ताफा शेताकडे वळवून शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला आणि शेतकऱ्यांच्या प्रती असलेली आपली संवेदनशीलता दाखवून दिली.
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या की, बोदवड तालुक्यात झालेल्या परतीच्या सततच्या संततधार पावसामुळे ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी बांधव अडचणीत सापडले असून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी शेतकरी बांधवांसोबत आहोत. सरकारने आचारसंहिता शिथिल करून या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी आपली मागणी असल्याचे सांगितले. यापूर्वी सुद्धा आपण निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केलेली आहे. परंतु , त्यावर सरकारने कोणतेही पाऊले उचलले नाहीत
शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या संततधार पावसामुळे शेतात कापणी केलेला मका आणि सोयाबीनला कोंब फुटून पिके जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट होऊन जेमतेम उत्पादन होऊ शकेल, अशी परिस्थिती असताना सततच्या संततधार पावसामुळे फुटलेला कापूस लोंबकळून त्याला कोंब फुटले आहेत. तर कैऱ्या काळवंडून सडत आहेत. त्यामुळे शेतकरी बंधूंचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकरी बांधवांचा या खरीप हंगामात बी बियाणे किटकनाशके खते यांच्यावर झालेला खर्च सुद्धा निघणे अवघड झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी बांधवांचे दिवाळे निघाल्याने शेतकरी बांधव आर्थिक गर्तेत सापडला आहे.
सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा
सरकारने आचारसंहिता बाजूला सारून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून या गंभीर संकटात शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहून शेतकरी बांधवांना आधार द्यावा. तसेच शेतकरी बांधवांनी बोदवड तालुक्यात मोठ्या क्षेत्रावर केळी पिकाची लागवड केली असून पीक विमा योजनेसाठी आवश्यक असलेल्या क्षेत्रा एवढी ही लागवड असल्याकारणाने बोदवड तालुक्याचा केळी पीक विमा योजनेत समावेश करावा. पिक विमा कंपन्यांनी अजूनही नुकसानीचे पंचनामे केलेले नसून पिक विमा कंपन्यांना नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी असल्याचे रोहिणी खडसे यांनी केली आहे. शेतातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर रोहिणी खडसे यांनी शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांसह बोदवड तहसील कार्यालय गाठून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत तहसीलदार यांना निवेदन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना(उबाठा) महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.