नवी मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची आज पहाटे चार वाजता नवी मुंबईतील एपीएमसीमधील भाजी मार्केटला भेट दिली. यावेळी त्यांनी माथाडी कामगार, व्यापारी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या. “केंद्र सरकारने राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे. पण राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल,” असं आश्वासन त्यांनी दिलंय.
“हे मार्केटच पहाटे चार वाजता उघडतं त्यामुळे येथे आलो. सहा वाजता भाजी मार्केट आणि नंतर इतर मार्केट सुरु होतात. हे मार्केट कसं चालतं, याच्यात काय अडचणी आहेत तसंच शेतकरी, व्यापारी, माथाडी कामागर यांच्याबाबतीत असणारे विषय समजून घेण्यासाठी आपण येथे आलो आहोत,” अशी माहिती रोहित पवार यांनी यावेळी दिली. रोहित पवार यांच्यासोबत यावेळी पदाधिकारी उपस्थित होते. “आम्ही लोकप्रतिनिधी असतो तेव्हा शेतकरी फोन करत असतात. तीन महिने झाले व्यापाऱ्याकडून पैसे नाही आले, हा व्यापारी दर कमी देत आहे वैगेरे तक्रार करतात. तेव्हा आम्ही त्या एपीएमसी मार्केटच्या प्रमुखांशी बोलून विषय सुटतो का यासाठी प्रयत्न करत असतो,” असं रोहित पवार यांनी सांगितलं. “महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडी समीरकरण योग्य पद्धतीने बसू शकते. पण शेवटी तो वाटाघाटीचा भाग असतो. पण काही प्रमाणात तुम्ही पदवीधर आणि विधान परिषद निवडणुका पाहिल्या तर एका ठराविक विचारधारेच्या विरोधात लोकंही आहेत आणि महाविकास आघाडी सरकारही आहे. एकत्रित ताकद मोठी आहे. हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दाखवून दिलं. त्यामुळे येथेही भाजपाच्या विचारधारेला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रित लढेल. पण शेवटी हे नेते ठरवतील,” असं रोहित पवार यांनी म्हटलं.
शेतकरी वर्गाच्या संरक्षणासाठी एपीएमसी मार्केटची गरज असल्याचं रोहित पवार यांनी नमूद केलं. सोबतच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत भाजपची भूमिका हुकूमशाहीची असल्याचं ते म्हणाले. यावेळी महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या होत असलेल्या ईडी चौकशीबद्दल रोहित पवार म्हणाले की, “उद्या मलाही ईडी नोटीस पाठवेल. ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे.”