धारूर (वृत्तसंस्था) पहिल्या पत्नीला मूलबाळ होत नाही म्हणून दुसरे लग्न करण्यासाठी जावयास सासरा विरोध करत होता. याच वादातून जावयाने चक्क सासऱ्याचा तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी मध्यरात्री केंद्रेवाडी शिवारामध्ये घडली. दत्ता रामभाऊ गायके (५२) असे खुन झालेल्या सासऱ्याचे नाव आहे. दरम्यान, मुलाचं लग्न दोन दिवसांवर आलेलं असतानाच बापाचा खून झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात अधिक असे की, केंद्रेवाडी येथील दत्ता रामभाऊ गायके यांना तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. मुलगा मल्हारीचा विवाह येत्या रविवारी (११ जून) औरंगपूर (ता. अंबाजोगाई) येथील मुलीशी होणार होता. लग्नतीन दिवसांवर येऊन ठेपल्याने घरी लग्नाची घाई सुरू होती. तर मुली, जावई आणि सर्व नातेवाईक केंद्रेवाडी येथे जमले होते. गायके यांच्या लहान मुलीचा कळंब तालुक्यातील हिंगणगाव कोथळा गावातील रामेश्वर गोरे याच्याबरोबर बारा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्न होऊन अनेक वर्षे उलटली तरी पत्नीला मूलबाळ होत नसल्यामुळे जावई रामेश्वर गोरेची दुसरे लग्न करण्याची इच्छा होती. परंतू जावयाने दुसरे लग्न केल्यानंतर आपल्या मुलीला त्रास होईल यामुळे सासरे दत्ता गायके हे जावयाला विरोध करत होते. याच मुद्द्यावरून अधूनमधून सासरे – जावयात नेहमी खटके उडत होते.
याच विषयावर चर्चा करण्यासाठी जावयाने सासऱ्यांना शेतात नेलं. त्या ठिकाणी दुसऱ्या लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की त्याने आपल्या सासऱ्यांवर धारदार शस्त्राने अनेक वार करत जखमी केले. या वेळी दत्ता गायके यांनी वाचवा.. वाचवा… म्हणून आरडाओरड केली. शेतातील पिकास पाणी देण्यास गेलेल्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा जावई दुचाकी तेथे ठेवून पसार झाला होता. दरम्यान, मुलाचं लग्न दोन दिवसांवर आलेलं असतांना जेथून मुलाची वरात निघणार होती, तिथंच अंत्ययात्रा निघाल्यामुळे गावात शोककळा पसरली होती.