मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक करणे अंमली विरोधी पथक अर्थात एनसीबीचे मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांना चांगलेच भोवले आहे. आर्यन खान केसचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आता वरिष्ठ अधिकारी संजय सिंह करणार आहे.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप होत होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी क्रुझवरील छापेमारी हा प्लान होता असा आरोप करण्यापासून ते वानखेडेंच्या राहणीमानापर्यंत विविध आरोप केले होते. वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावरही त्यांनी संशय व्यक्त केला होता. त्यामुळे वानखेडे वादात सापडले होते. त्यानंतर क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील पंचानीही धक्कादायक कबुली दिली होती. तर काही पंचाना अटकही करण्यात आली होती. मुंबई एनसीबीकडून शाहरुख खानकडून २५ कोटींची मागणी केल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
आर्यन खान केससह सहा केसेस वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आल्या आहेत. या सर्व केकेसचा तपास दिल्ली एनसीबीची टीम करणार आहे. तशी माहिती एनसीबीचे वरीष्ठ अधिकारी मुथा अशोक जैन यांनी दिलीय. दरम्यान, आर्यन खान प्रकरणाची चौकशी आता संजय सिंग यांच्याकडे देण्यात आली आहे. उद्यापासूनच संजय सिंग या प्रकरणाची तपास करणार येणार असल्याचं सूत्रांनी सांगितले.