मुंबई (वृत्तसंस्था) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी रविवारी (२८ फेब्रुवारी) राजीनामा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही राठोड यांचा राजीनामा फ्रेम करण्यासाठी नाही, असं म्हणत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, राठोड यांचा राजीनामा अद्याप राज्यपालांकडे पोहोचलाचं नसल्याचं वृत्त आहे. त्यामुळे आता राठोड यांच्या राजीनाम्याचं पुढे काय झालं. राठोड अजूनही मंत्रीपदी कसे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.
मात्र संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पाठवलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. तीन दिवस उलटले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या संजय राठोड अद्यापही वनमंत्री पदावर कायम आहेत. बीडमधील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणाशी वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याचा आरोप करत भाजपानं राजीनामा घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. अधिवेशन चालू न देण्याचा इशारा भाजपानं दिला होता. पूजा चव्हाण प्रकरणावरून विरोधकांकडून कोडीं होण्याची शक्यता असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.
रविवारी (२८ फेब्रुवारी) संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी सपत्नीक भेट घेतली आणि राजीनामा सुपूर्द केला. राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्यावर कार्यवाही होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. “राजीनामा फ्रेक करुन लावण्यासाठी घेतला नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र, राजीनामा घेऊन दोन-तीन दिवस लोटले, तरीही संजय राठोड मंत्रीपदी कायम आहेत. संजय राठोड यांचा राजीनामा अजूनही राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे राठोड कायदेशिरदृष्ट्या अजूनही मंत्रिपदी कायम आहेत. तर दुसरीकडे राठोड यांच्या राजीनाम्याचं पुढे काय झालं, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
अहवाल आल्यानंतरच राजीनामा?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांचा राजीनामा महिना अखेरीपर्यंत स्वतःकडेच ठेवू शकतात. सध्या पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणावरून राठोड यांच्यावर आरोप झालेले असून, अहवाल आल्यानंतर राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाऊ शकतं किंवा त्यांच्याकडे दुसरं खातं दिलं जाऊ शकतं, असं शिवसेना नेत्यांनं सांगितल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. त्याचबरोबर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे आलेला नसल्याचं वृत्त राजभवनातील सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
काय आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण?
मूळची बीडमधल्या परळीची असलेल्या पूजा चव्हाण या २२ वर्षाच्या मुलीचा पुण्यातील राहत्या घरातून पडून ७ फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. इंग्लिश स्पीकिंगच्या क्लाससाठी ती पुण्यात आली होती. तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने तक्रार दाखल केली होती. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली. त्यातच पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिप समोर आल्या. त्यानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.